जालना जिल्ह्य प्रतिनिधी गजानन राजबिंडे,
जालना : जालना जिल्ह्यातील घनसावंगी, अंबड, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात सन २०२२-२३ मधील अतिवृष्टी, पूर व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या अनुदान वितरणात मोठ्या गैरव्यवहाराचे आरोप समोर आले आहेत. या संदर्भात आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे.
माहितीनुसार, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून सामूहिक अनुदान मंजूर करण्यात आले होते. मात्र, संबंधित विभागातील काही अधिकाऱ्यांनी वास्तविक लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ न देता इतर जिल्ह्यातील बोगस शेतकरी दाखवून अनुदानाची कोट्यवधी रुपयांची रक्कम वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला असून, चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात तक्रारदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असून, भविष्यात योग्य कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























