आळंदी (रवी कदम) :
षटतिला एकादशी आणि मकर संक्रांत एकत्र आल्याने आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज (माऊली) मंदिरात राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. विशेषतः महिलांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली. माऊली मंदिर परिसर, इंद्रायणी नदीचे दोन्ही घाट, स्काय वॉक पुलावर भाविकांची सतत वर्दळ होती.
मकर संक्रांत व एकादशीच्या पावन पर्वावर आळंदी देवस्थानच्या वतीने इंद्रायणी नदी घाटावर महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम तसेच इंद्रायणी महाआरती वेदमंत्र व जयघोषात पार पडली. मंदिर परिसरात आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली होती.
इंद्रायणी आरती सेवा समिती, आवेकर-भावे रामचंद्र संस्थान यांच्या सहकार्याने सुमारे २०० हून अधिक महिलांना वाणाचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी नदी प्रदूषण रोखण्याचा आणि नदी परिसर स्वच्छ ठेवण्याचा सामूहिक संकल्प जाहीर करण्यात आला. आळंदी देवस्थानच्या पहिल्या महिला विश्वस्त ॲड. रोहिणी पवार यांच्या पुढाकारातून प्रथमच देवस्थानतर्फे इंद्रायणी घाटावर महिलांसाठी हळदी-कुंकू उपक्रम राबविण्यात आला.
माऊली मंदिरात श्रींना तिळाचा अभिषेक व महानैवेद्य अर्पण करण्यात आला. भाविकांची संख्या लक्षात घेऊन महिलांसाठी मंडपातून तर पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र मार्गाने दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावे यासाठी देवस्थानने योग्य नियोजन केले.
शहरातील श्री विष्णू मंदिर, श्री राम मंदिर, श्री स्वामी महाराज मंदिर, हजेरी मारुती, भैरवनाथ मंदिर आदी ठिकाणीही भाविकांची मोठी गर्दी झाली. दर्शनबारी परिसरातील अरुंद रस्त्यांमुळे काही प्रमाणात वाहतुकीची अडचण निर्माण झाली.
संपूर्ण उत्सवकाळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिंद्र नाईक यांच्यासह देवस्थान कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांनी परिश्रमपूर्वक काम पाहिले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























