आळंदी | प्रतिनिधी रविदास कदम)
आळंदी शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी संपूर्ण कारभार एका पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी आळंदी नगरपरिषदेकडून करण्यात आली आहे. सध्या शहरातील विविध भाग वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे.
नगरपरिषदेकडून करण्यात आलेल्या ठरावानुसार, शहराचे भौगोलिक विभाजन दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये असल्यामुळे घटनांवर त्वरित प्रतिसाद देण्यात विलंब होतो. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून कायदा-सुव्यवस्था राखण्यामध्ये अडथळे निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याबाबत नगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाकडे निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. विशेषतः गर्दी, वाहतूक व्यवस्थापन, उत्सव काळातील सुरक्षा आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी एकाच पोलिस ठाण्याची जबाबदारी निश्चित केल्यास प्रशासन अधिक सक्षमपणे काम करू शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत करत तातडीने कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























