:
नाशिक प्रतिनिधी:
आज संपूर्ण जग आतंकवादाच्या संकटाने हैराण झाले असून सामान्य माणूस या दहशतीचा कसा बळी ठरतो, याचे प्रभावी चित्रण ‘फुलपाखरू’ या कादंबरीत करण्यात आले आहे, असे प्रतिपादन प्रा. जगदीश देवरे यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे हुतात्मा स्मारक येथे आयोजित ‘बोलू काही’ या अभिनव उपक्रमांतर्गत २१५ वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी फुलपाखरू या कादंबरीवर ऐसपैस संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिशोत्तमा प्रकाशनचे संचालक रवींद्र पाटील होते.
प्रा. देवरे पुढे म्हणाले की, दक्षिणगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीवरील गंगापूर धरणाची भिंत फोडून नाशिक शहर उद्ध्वस्त करण्याचा दहशतवादी कट या कादंबरीत मांडण्यात आला आहे. हे भयानक कारस्थान रचणारे कोण होते, ते दहशतवादी कसे बनले, त्यांच्या मागचे जाळे उघडकीस आले की नाही, की आजही ही छुपी कारवाई सुरू आहे—असे अनेक प्रश्न कादंबरीतून उलगडले जातात. नाशिकवरची ही टांगती तलवार खरोखर हटली की नाही, याचा वेगवान व नाट्यमय घटनांच्या माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न ‘फुलपाखरू’मध्ये करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान भरत क्षत्रीय व दीपक भामरे या भाग्यवान श्रोत्यांचा ग्रंथभेट देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र देसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुहास टिपरे यांनी मानले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























