(मानव मित्र न्यूज प्रतिनिधी बबनराव मोहिते पाटील)
📍 पुणे, हडपसर | दिनांक : २२ मार्च २०२६
पुण्यातील हडपसर परिसरातील शंकरमठा येथील मिरेकर वस्तीमध्ये पहाटे लागलेल्या भीषण आगीत तब्बल २५ झोपड्या जळून खाक झाल्या. या दुर्घटनेमुळे अनेक कुटुंबे बेघर झाली असून गेल्या तीन दिवसांपासून ते अन्न, पाणी आणि निवाऱ्याविना उघड्यावर जीवन जगत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वैदूवाडी वाहतूक शाखेजवळील कालव्यालगत असलेल्या मिरेकर वस्तीमध्ये शनिवारी (दि. ७) अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण करत झोपड्यांना वेढा घातला. झोपेत असलेल्या नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली, मात्र सर्वांचे संसार उघड्यावर आले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या आगीत घरातील टीव्ही, पंखे, गॅस सिलिंडर, मिक्सर, भांडीकुंडी, कपडे, सायकली तसेच काहींच्या दुचाकी आणि रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत.
दरम्यान, वडार समाजाचे समाजसेवक सागर अशोक चौगुले यांनी घटनास्थळी तातडीने भेट देत पीडित कुटुंबांची विचारपूस केली. तसेच भरत विठकर यांची भेट घेऊन त्यांनी पीडितांना तत्काळ आर्थिक मदतही केली.
सध्या या कुटुंबांना तातडीने अन्न, पाणी आणि निवाऱ्याची गरज असून प्रशासनाने त्वरित मदत करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. 

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























