प्रतिनिधी अशोक कुंभार / काम मिळूनही भटकी-विमुक्तांना काम करू दिले जात नाही; गावगुंडगिरीला शासनाचा आळा हवा — बबनराव मोहिते
गावपातळीवर रोजगाराच्या योजना मंजूर होऊनही भटकी-विमुक्त समाजातील नागरिकांना प्रत्यक्षात काम करू दिले जात नसल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. “आमच्या गावात तुम्ही काम करायचे नाही,” अशी उघड दादागिरी करत काही गावगुंड व स्थानिक लोकप्रतिनिधी भटकी-विमुक्त समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप होत आहे.
काम मंजूर झाले तरी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या आश्रयाने काही समाजकंटक काम करू देत नाहीत. ही सरळसरळ मनमानी असून, अशा सरपंच व सदस्यांवर शासनाने तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी भटकी-विमुक्त समाजाकडून करण्यात येत आहे.
याबाबत बोलताना भटकी-विमुक्त महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री बबनराव मोहिते यांनी सांगितले की, “भटकी-विमुक्त समाजाला जाणीवपूर्वक रोजगारापासून दूर ठेवले जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, गावगुंडगिरीला शासनाचा कठोर प्रतिबंध बसायलाच हवा. अन्यथा भटकी-विमुक्त समाजाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”
या प्रकारामुळे ग्रामीण भागातील भटकी-विमुक्त समाजात तीव्र संतापाची भावना असून, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























