पुरंदर (प्रतिनिधीअशोक कुंभार)
दुय्यम निबंधक तथा सब-रजिस्टर कार्यालयात होत असलेल्या बोगस दस्तांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसह विविध जनहिताच्या मुद्द्यांसाठी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सोमवार, दि. ३ नोव्हेंबर २०२५ पासून उपविभागीय अधिकारी तथा प्रांत पुरंदर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अजूनही आंदोलनाची दखल न घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
संघर्ष परिषदेच्या मुख्य मागण्या:
बोगस दस्तांवर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपक वाघचौरे यांची तात्काळ बदली करावी.
ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत.
अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील नागरिकांचे दाखले व सर्कल पंचनामे तातडीने करून द्यावेत.
तहसिल व प्रांत कार्यालयात प्रलंबित महसुली खटल्यांचा निकाल त्वरित द्यावा.
भूमी अभिलेख कार्यालयात पावती न देता चारपट पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.
शेतकऱ्यांच्या कमी क्षेत्राची देखील मोजणी करावी.
नेतृत्व आणि उपस्थिती:
या आंदोलनाचे नेतृत्व राज्याचे युवक अध्यक्ष मनोज भिसे यांनी केले.
आंदोलनाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रा. सुभाष वायदंडे यांच्या आदेशानुसार,
ज्येष्ठ नेते पंढरीनाथ आढागळे सर आणि जिल्हा अध्यक्ष गोकुळ भिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
या प्रसंगी आंदोलनास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), श्रमिक ब्रिगेड, बहुजन हक्क परिषद, तसेच अनेक सामाजिक संघटनांचा पाठिंबा लाभला.
विशेषतः विष्णूदादा भोसले, सुधीर शेलार, सुनिलतात्या धिवार, बदाम आण्णा माकर, महादेव खेंगरे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशासनाला इशारा:
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, “मा. प्रांत अधिकारी मॅडम यांनी सर्व शासकीय विभाग प्रमुखांची बैठक बोलवावी आणि संघर्ष परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण द्यावे. अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल.”

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























