पुरंदर.जेजुरी (सासवड प्रतिनिधी – अशोक कुंभार) : जेजुरीसह राज्यातील विविध धार्मिक स्थळांवर विक्री होणाऱ्या भंडाऱ्यात भेसळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्याच्या शुद्धतेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यासंदर्भात आमदार विक्रम पाचपुते यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे भंडाऱ्याची स्पष्ट व्याख्या जाहीर करण्याची मागणी केली आहे.
भंडारा हा धार्मिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असून तो केवळ शुद्ध हळदीपासून तयार केलेला असावा, असे मत व्यक्त करण्यात आले आहे. बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या काही भंडाऱ्यामध्ये रासायनिक रंग किंवा इतर घटक मिसळले जात असल्याच्या तक्रारींमुळे भाविकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
भाविक मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण करत असल्याने त्यातील कण श्वासावाटे शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे डोळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे भंडाऱ्याच्या गुणवत्तेबाबत कठोर नियम लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाने भंडाऱ्याची शुद्धता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच “भंडारा म्हणजे शुद्ध हळद” अशी अधिकृत व्याख्या जाहीर करून भेसळ रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
जेजुरीसारख्या धार्मिक क्षेत्रात भाविकांच्या श्रद्धेशी संबंधित असलेल्या भंडाऱ्याच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























