छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी राहुल बोबडे
जालना मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कथित फसवणूक प्रकरणात तपासाला गती देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ठेवीदार न्याय हक्क कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) चे पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
समितीने सादर केलेल्या निवेदनात तपासाची सद्यस्थिती, आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया, आरोपींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई, ठेवीदारांचे जबाब, तसेच तपास पूर्ण होण्यासाठीची संभाव्य कालमर्यादा याबाबत माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, या प्रकरणातील पीडित ठेवीदार गेल्या दीड ते दोन वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असून, आपल्या मागण्यांसाठी त्यांनी १८२ दिवस आंदोलन केले आहे. त्यामुळे संबंधित दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करून ठेवीदारांचे अडकलेले पैसे परत मिळवून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी समितीचे डॉ. लक्ष्मण भीमराव सावंत यांच्यासह भगवान साहेबराव रेगुडे, दिनकर उखडे, आकाश सातपुते, तात्यासाहेब वाघमारे, तारक सरकार, सुरेश खडुळे, अंबादास खोमणे, प्रशांत पाटील आणि संजय लिमसे आदी ठेवीदार उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























