प्रतिनिधी अशोक कुंभार सासवड
पुणे: गिरणी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी गिरणी कामगार सभा – पुणे जिल्हा आणि संयुक्त मराठी मुंबई चळवळ यांच्या वतीने विधानभवनावर धडक मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
आयोजकांच्या मते, मुंबईच्या विकासात गिरणी कामगारांचे मोठे योगदान असूनही आजही अनेक कामगार आणि त्यांच्या वारसांना हक्काचे घर व पुनर्वसन मिळालेले नाही. त्यामुळे सरकारने या प्रश्नांकडे तात्काळ लक्ष देऊन गिरणी कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आयोजकांनी सांगितले की, गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी हा लढा सुरू असून “आपण लढत राहू – न थकता, न थांबता” या घोषवाक्याखाली आंदोलन उभारले जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील कामगारांना एकत्र आणण्यासाठी विविध ठिकाणी बैठक व जनजागृती कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत.
या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने गिरणी कामगार, त्यांचे वारस आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार असून सरकारने त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























