पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार)
देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे वारकरी, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नदी स्वच्छतेसाठी लाखो-कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्याचे दावे प्रशासनाकडून केले जात असताना प्रत्यक्षात नदीतील जीवसृष्टीच धोक्यात आल्याचे चित्र समोर आले आहे. प्रदूषण, सांडपाणी आणि रासायनिक घटकांमुळे माशांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून यामुळे नदीकाठच्या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.
पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी देहूत दाखल होणार असताना इंद्रायणी नदीची ही अवस्था प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. “नदी स्वच्छतेच्या नावाखाली नेमका पैसा कुठे खर्च झाला?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या कार्यकर्त्यांनी मृत मासे बाहेर काढण्याचे काम हाती घेतले असले तरी प्रदूषणाला जबाबदार असलेल्या घटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे..
इंद्रायणी नदीत हजारो मासे का मेले?
नदी प्रदूषणासाठी जबाबदार कोण?
स्वच्छता मोहिमांवर खर्च झालेल्या निधीचा हिशोब कोण देणार?
पालखी सोहळ्यापूर्वी नदी स्वच्छ करण्यासाठी तातडीची पावले उचलली जाणार का?
इंद्रायणीचे प्रदूषण ही केवळ पर्यावरणाची नव्हे तर श्रद्धेचीही हत्या असल्याची भावना वारकरी व्यक्त करत आहेत. दोषींवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























