आळंदी (प्रतिनिधी सचिन शिंदे)
आळंदी : समस्त हरळी वैष्णव समाज धर्मशाळा आळंदी येथे सुरू असलेल्या पत्रा शेड व इतर दुरुस्तीच्या कामांवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. संस्थेचे विश्वस्त, सचिव आणि पदाधिकाऱ्यांनी ही कामे बेकायदेशीर पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करत थेट आळंदी नगरपरिषद गाठली.
नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि काही नगरसेवकांसोबत झालेल्या बैठकीत संबंधित विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संस्थेचा वाद सध्या धर्मादाय विभागात प्रलंबित असल्याने, अधिकृत आणि कायदेशीर ट्रस्टी तसेच अध्यक्ष यांनाच कामाची परवानगी दिली जाईल, असे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले. 
नगरपरिषद प्रशासनाने कठोर भूमिका घेत, कोणत्याही प्रकारची मनमानी अथवा नियमबाह्य कामे केल्यास संबंधितांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला. त्यामुळे धर्मशाळेतील सुरू असलेल्या कामांबाबत आता प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.
या बैठकीला समाजहित जपणारे अनेक पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजामध्ये शांतता आणि पारदर्शकता राहावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. बैठकीनंतर सचिव रमण सोनवणे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























