सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे अशोक कुंभार):
अंबोडी गावातील महारवतन धारक बाधित शेतकऱ्यांनी तहसीलदारांनी दिलेल्या अन्यायकारक आदेशाच्या निषेधार्थ तहसीलदार कार्यालयासमोर दिनांक १९ जानेवारी २०२६ पासून जाहीर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले असून, आज या आंदोलनाला तेरा दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांनी अद्याप या आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही.
तहसीलदारांनी दिलेला अन्यायकारक आदेश रद्द होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी घेतली आहे. प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकरी अधिक संतप्त झाले असून, पुढील काळात उग्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आंदोलन चिघळल्यास यास संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
हा निर्णय आर्थिक तडजोडीतून घेण्यात आल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला असून, सदर प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल होण्यास पात्र परिस्थिती आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी सासवडचे मंडल अधिकारी सुहास कांबळे व माननीय तहसीलदार विक्रम राजपूत यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी द्यावी, अशी ठाम मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
उपोषणात प्रकाश रामचंद्र रणपिसे, चंद्रकांत जनार्धन रणपिसे, अशोक डाकू रणपिसे यांच्यासह इतर बाधित शेतकरी सहभागी झाले आहेत. १३ दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणताही पर्याय किंवा तोडगा काढण्यात आलेला नाही, त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























