पुणे आळंदी (संपादक रोहिदास कदम):समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा प्रकरणातील वाद आणखी तीव्र होत असून प्रशासनाची नोटीस असतानाही मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काही समाजबांधवांनी केला आहे. यामुळे पोलीस प्रशासन आणि आळंदी नगरपालिकेच्या कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
समाजातील काही पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, धर्मशाळेचा वाद सध्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त, पुणे यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे. असे असताना न्यायप्रविष्ट विषयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याशिवाय, वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी आळंदीत येत असताना अशा आंदोलनांमुळे भाविकांना त्रास होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून मोर्चा व आंदोलनाच्या धमक्या देणे हे कायद्याच्या चौकटीत योग्य नसल्याचे मत काही समाजबांधवांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, संबंधित व्यक्तींवर “सरकारी कामात अडथळा निर्माण करणे” या स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काही नागरिक व समाजबांधवांकडून करण्यात येत आहे. पोलीस प्रशासन, नगरपरिषद आणि संबंधित शासकीय यंत्रणांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
वारी काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे आणि भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
(टीप : वरील सर्व बाबी संबंधितांकडून करण्यात आलेले आरोप व मागण्या असून, त्याबाबत संबंधित पक्षाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
“नोटीस असतानाही मोर्चाची तयारी; सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही
“धर्मशाळा वाद न्यायप्रविष्ट असताना आंदोलनाचा प्रयत्न; वारीतील वारकऱ्यांना त्रास होण्याची भीती”

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























