तीर्थपुरी | प्रतिनिधी राहुल बोबडे)
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तहसील अंतर्गत तीर्थपुरी मंडळ विभागात आयोजित करण्यात आलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान – टप्पा १” मध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. नागरिकांच्या विविध महसुली समस्या एकाच छताखाली सोडविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव स्पष्टपणे दिसून आला.
या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित समस्या, आधार लिंक, प्रमाणपत्रे, फेरफार, जमीन नोंदी, शासकीय योजनांचे अर्ज आदी प्रश्न “सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी” पद्धतीने मार्गी लावणे हा होता. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील नवीन तरतुदींची माहिती देणे आणि डिजिटल सेवांचा प्रसार करणे हेही उद्दिष्ट होते.
मात्र प्रत्यक्षात शिबिरात मोठ्या प्रमाणावर अव्यवस्था निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. सकाळपासून रांगा लावून बसलेल्या अनेक ग्रामस्थांना योग्य माहिती मिळाली नाही. काही अधिकारी येऊन तातडीने निघून गेल्याने नागरिकांची कामे रखडली. अनेकांना फक्त तोंडी आश्वासन देत परत पाठविण्यात आल्याची तक्रार करण्यात आली.
विशेषतः वृद्ध नागरिक, महिला आणि ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. पुरेशा नियोजनाअभावी नागरिकांना त्रास सहन करावा लागला असून “रोगापेक्षा इलाज भयंकर” अशी परिस्थिती निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.
“सरकारने समाधान शिबिराच्या नावाखाली आम्हाला बोलावले, पण प्रत्यक्षात कुठलेही समाधान मिळाले नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली. प्रशासनाने आगामी शिबिरांमध्ये योग्य नियोजन करून नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळेल याची दक्षता घ्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























