पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार):
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी कोल्हापूर येथे राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती व स्फूर्ती सदन’ उभारण्यात येणार आहे. या स्मृती सदनाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, समाजप्रबोधन आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदानाचे जतन करण्यात येणार असून, भावी पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळणार आहे.
अण्णाभाऊ साठे यांचे कोल्हापूर आणि सीमाभागाशी अतूट नाते होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, कामगार चळवळी तसेच लोकजागृतीच्या विविध उपक्रमांत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या या कार्याची दखल घेत कोल्हापुरात स्मृती व स्फूर्ती सदन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यास, संशोधन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक जनजागृतीला चालना मिळेल. राज्यातील साहित्यप्रेमी, अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी हे स्मृती सदन प्रेरणास्थान ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























