(पुणे आळंदी प्रतिनिधी रवी कदम)
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र आळंदी येथे १२ ते २० नोव्हेंबर या कालावधीत भव्य यात्रा भरवण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक आळंदी येथे येऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचा दर्शन सोहळा आणि दिंडी उत्सवात सहभागी होणार आहेत. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
१५ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा तर १७ नोव्हेंबर रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात महाराष्ट्राच्या विविध भागांतून सुमारे १० ते १५ लाख भाविक आळंदी आणि देहू परिसरात येणार आहेत.
वाहतुकीवरील ताण लक्षात घेता पिंपरी-चिंचवड पोलिस वाहतूक शाखेने विविध मार्गांवर बंदी तसेच पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. विशेषतः जड व अवजड वाहनांना आळंदी परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
वाहतुकीतील महत्त्वाचे बदल :
मोशी चौक, भारतमाता चौक, चिंबळी फाटा, चाकण आळंदी फाटा, माजगाव फाटा, भोसे फाटा या मार्गांवरून आळंदी कडे जाणाऱ्या जड वाहनांना प्रवेश बंदी.
कोयाळी, मरकळ, धानोरी फाटा, भोसरी, विश्रांतवाडी मार्गे पर्यायी व्यवस्था.
देहू कमान, कॅनबे चौक, देहूफाटा या परिसरातही जड वाहनांना प्रवेशबंदी.
देहू कमान ते चौदा टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील.
विशेष सूचना :
१२ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या काळात अत्यावश्यक सेवा व दिंडी वाहने वगळता इतर सर्व वाहनांना आळंदी शहरात प्रवेशबंदी राहणार आहे. पुणे-आळंदी, मोशी-आळंदी, चिंबळी-आळंदी, चाकण-आळंदी, वडगाव घेनंद-आळंदी आणि मरकळ-आळंदी हे प्रमुख रस्ते ठराविक ठिकाणी बंद राहतील.
भाविकांसाठी पार्किंगची सोय :
प्रशासनाने भाविकांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे.
तळेकर पाटील चौक परिसरात दक्षिण व उत्तर दिशेला सुमारे तीन एकर क्षेत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.
डुडुळगाव जकात नाका जवळ ज्ञानविलास कॉलेज परिसर, बोपदेव चौकातील मुंगसे पार्किंग, चाकण रोडवरील इंद्रायणी हॉस्पिटल समोर तसेच वडगाव रोडवर २५ एकर क्षेत्रात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
वाहतुकीतील हे बदल लक्षात घेऊन नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. 

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























