आळंदी | प्रतिनिधी सचिन शिंदे
आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना आळंदीतील तयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी गुरुवारी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसराला भेट देत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण नियोजन बैठक घेतली.
आषाढी वारीदरम्यान लाखो भाविक आळंदीत दाखल होत असल्याने त्यांच्या सोयी-सुविधा, सुरक्षा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन यंत्रणांच्या सज्जतेबाबत सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. वारी निर्विघ्न, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी यासाठी विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय ठेवण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.
भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्य सेवा, वाहतूक नियंत्रण आणि गर्दी व्यवस्थापनावर विशेष भर देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग आणि पार्किंग व्यवस्थेचे योग्य नियोजन करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
यावेळी आळंदी नगरपरिषद व आळंदी ग्रामस्थांच्या वतीने विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीस नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, सभागृह नेते सचिन गिलबिले, आळंदी देवस्थानचे विश्वस्त मंडळ तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरू असलेल्या तयारीमुळे यंदाची वारी अधिक सुकर, सुरक्षित आणि भाविकाभिमुख होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























