(प्रतिनिधी अशोक कुंभार)
लोणी-काळभोर (पुणे) : भारत सध्या सुमारे ९४ टक्के सेमिकंडक्टर चिप्स आयातीवर अवलंबून आहे. सेमिकंडक्टर तंत्रज्ञानातील ही परावलंबित्वाची स्थिती भविष्यात देशासाठी गंभीर ठरू शकते. त्यामुळे भारताला सेमिकंडक्टर क्षेत्रात स्वावलंबी होणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी केले.
एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड सायन्सेसतर्फे आयोजित “सेमिकंडक्टर तंत्रज्ञान” या विषयावरील राष्ट्रीय परिसंवाद आणि सेमिकंडक्टर तंत्रज्ञानातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई)’ तसेच विद्यार्थ्यांच्या ‘सेमिकंडक्टर क्लब (सेमी सी)’ यांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम स्व. उर्मिला ताई कराड सभागृहात पार पडला.
कार्यक्रमासाठी Bharat Electronics Limited (बीईएल) चे कार्यकारी संचालक सूर्यनारायण मूर्ती, नेट्रा अॅक्सिलरेटर फाउंडेशनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक पवार, व्हीएसएलआय सोसायटी, बंगळुरूचे अध्यक्ष डॉ. सत्या गुप्ता, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, अधिष्ठाता डॉ. सुदर्शन सानप, डॉ. विरेंद्र शेटे, कार्यक्रम समन्वयक डॉ. रमेश माळी यांच्यासह उद्योगक्षेत्रातील मान्यवर, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
₹७६,००० कोटींचा मिशन निधी
प्रा. डॉ. कराड म्हणाले की, जर सेमिकंडक्टर उत्पादनात अग्रगण्य देशांनी पुरवठा थांबविला, तर भारताची मोठी कोंडी होऊ शकते. ही परिस्थिती टाळण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सेमिकंडक्टर मिशनची घोषणा केली असून, देशात सेमिकंडक्टर उद्योग उभारण्यासाठी तब्बल ₹७६,००० कोटींचा निधी मंजूर केला आहे. आगामी काळात या क्षेत्रातील गुंतवणूक ₹१.६० लाख कोटींपर्यंत वाढण्याची अपेक्षा असून, विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
तैवानची ६५% मक्तेदारी
यावेळी सूर्यनारायण मूर्ती म्हणाले की, सध्या भारतात अत्याधुनिक उपकरणे, प्रक्रिया क्षमता आणि तज्ज्ञ मनुष्यबळाची उपलब्धता मर्यादित आहे. त्यामुळे भारत जपान, दक्षिण कोरिया, तैवान, अमेरिका आणि चीन यांसारख्या देशांवर अवलंबून आहे. विशेषतः तैवानकडे जागतिक सेमिकंडक्टर उत्पादनातील सुमारे ६५ टक्के हिस्सा असून या क्षेत्रात त्यांची आघाडी आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडही सरकारच्या सहकार्याने देशाचे परावलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुणे बनेल सेमिकंडक्टर हब
चौकटीत बोलताना विवेक पवार म्हणाले की, सध्या विद्यार्थ्यांचा कल सॉफ्टवेअर अभियांत्रिकीकडे अधिक आहे; मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे कोअर अभियांत्रिकी शाखांकडे वळणे गरजेचे आहे. योग्य परिसंस्था निर्माण केल्यास बंगळुरू आणि चेन्नईनंतर पुणे हे सेमिकंडक्टर हब म्हणून विकसित होऊ शकते. त्यामुळे युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल.
संशोधनाभिमुख शिक्षणावर भर
प्रास्ताविकात प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी यांनी विद्यापीठाच्या संशोधनाभिमुख धोरणाची माहिती दिली. कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. यांनी उद्योगसहकार्य आणि प्रगत तंत्रज्ञान शिक्षणाद्वारे जागतिक दर्जाचे अभियंते घडविण्याच्या विद्यापीठाच्या ध्येयधोरणावर भाष्य केले.
विश्वशांती प्रार्थनेने सुरू झालेल्या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. आभार प्रदर्शन डॉ. सुदर्शन सानप यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. स्नेहा वाघटकर यांनी केले.

लोणी-काळभोर (पुणे): सेमिकंडक्टर तंत्रज्ञानातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई)’ चे उद्घाटन करताना डावीकडून प्रा. डॉ. मंगेश कराड, सूर्यनारायण मूर्ती, विवेक पवार, डॉ. सत्या गुप्ता व विद्यापीठातील अन्य पदाधिकारी.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम



















