आळंदी (रवी कदम) : संतांची नगरी आळंदीमध्ये कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून आळंदी नगरपरिषदेच्या कचरा डेपोमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया प्रभावीपणे राबविली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रिया आणि वैज्ञानिक विल्हेवाट लावण्याऐवजी सर्रास कचरा जाळला जात असल्याने परिसरात धुराचे लोट, तीव्र दुर्गंधी आणि प्रदूषणाचे संकट निर्माण झाले आहे.
केळगाव येथील स्थानिक नागरिक संदीपभाऊ मुंगसे यांनी सांगितले की, डेपोमध्ये वारंवार कचरा जाळला जात असल्याने केळगावसह पंचक्रोशीतील नागरिकांना श्वसनाचे विकार, डोळ्यांची जळजळ, दम लागणे अशा विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे पाऊस पडल्यानंतर सर्व घाण पाणी तळ्यात येऊन जमा होते तळ्यामध्ये मुके जनावर पाणी पितात व जनावराची हानी झालेली आहे व आजारपण येत आहे. धुरामुळे अनेक नागरिकांच्या डोळ्यांची आग होत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कचरा डेपोमध्ये कोणतेही प्रभावी वर्गीकरण किंवा प्रक्रिया होत नसून कचऱ्याचे ढिगारे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे परिसरात माशा, मच्छर आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढला असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन त्रस्त झाले आहे.
विशेष म्हणजे, शासनाकडून तीर्थक्षेत्र विकासासाठी आणि विविध योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होत असताना कचरा व्यवस्थापनासारख्या मूलभूत प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक वेळा तक्रारी, निवेदने आणि पाठपुरावा करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि नगरविकास विभागाने तात्काळ हस्तक्षेप करून कचरा डेपोची प्रत्यक्ष पाहणी करावी, कचरा जाळण्याचे प्रकार थांबवावेत आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र नगरीत एकीकडे स्वच्छतेच्या घोषणा दिल्या जात असताना दुसरीकडे कचरा डेपोमधून निघणाऱ्या धुराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. “कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सुटणार की नागरिकांना धुरातच जगावे लागणार?” असा संतप्त सवाल आता केळगाव पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित करत आहेत.
मानव मित्र न्यूजचा सवाल
कचरा व्यवस्थापनासाठी निधी आहे, यंत्रणा आहे, मग कचरा जाळण्याची वेळ का येते? नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार?

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























