तीर्थपुरी (प्रतिनिधी – राहुल बोबडे, तालुका धनसागी) :
तीर्थपुरी शहर व परिसरातील गोदाकाठ भागात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रामसगाव, बोरगाव तसेच आसपासच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी सुरू असून, यामुळे रस्त्यांची दुरवस्था, वाढते अपघात आणि पर्यावरणीय नुकसान होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत दर पाच मिनिटांनी वाळूने भरलेले ट्रक आणि हायवा वाहनांची वाहतूक सुरू असते. मात्र, पोलीस प्रशासन, तहसील कार्यालय, भूमी अभिलेख विभाग आणि जिल्हा प्रशासन यांना याची पूर्ण माहिती असूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
गावकऱ्यांनी यापूर्वी अनेक वेळा निवेदन देऊनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. उलट, वाळू उपशामुळे चोरीच्या घटना, अपघात आणि सामाजिक असुरक्षितता वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, स्थानिक बांधकामांसाठी वाळू उपलब्ध होत नसताना बाहेर मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून, पुढील आठ दिवसांत मोठे आंदोलन, निवेदनांचा वर्षाव आणि मंत्रालय स्तरावर तक्रारी दाखल करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, या अवैध धंद्याला पाठीशी घालणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























