,( वार्ताहर रविदास कदम )
आळंदी (पुणे) : आळंदी येथील जुन्या एस.टी. स्टँडलगत असलेल्या जाहूरकर वारकरी शिक्षण संस्थेत १२ वर्षीय मुलीचे शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संस्थेची पाहणी केली असता अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याने संस्था तात्काळ बंद करण्यात आली.
या कारवाईदरम्यान संस्थेत राहणाऱ्या ४३ मुले आणि ४ मुली अशा एकूण ४७ विद्यार्थ्यांचे पुनर्वसन शासकीय बालगृहात करण्यात आले आहे.
नगरपरिषद कर्मचारी, आळंदी पोलिसांचे दामिणी महिला पथक तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. या तपासणीत संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात अनेक गंभीर नियमभंग आढळून आले.
पाहणीत आढळलेल्या गंभीर त्रुटी
विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज व आधार नोंदी उपलब्ध नव्हत्या
पालकांची माहिती व छाननी समिती अस्तित्वात नव्हती
नियमानुसार कर्मचारी संख्या नव्हती
अभ्यासिका, भोजन हॉल व निवास व्यवस्था एकत्र
स्नानगृहे व स्वच्छतागृहे अपुरी आणि हवेशीर नसलेली
भोजनाचे निश्चित मेनू पत्रक नव्हते
प्रवेश गेट रजिस्टर, प्रथमोपचार पेटी व तक्रार पेटी नव्हती
संस्थेला मुला-मुलींना निवासी ठेवण्याची शासकीय परवानगी नव्हती
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार रात्रीचे उरलेले अन्न सकाळी दिले जात असल्याची बाबही समोर आली आहे.
शासन निर्णयानुसार कारवाई
महिला व बाल विकास विभागाच्या ३ जुलै २०२५ च्या शासन निर्णयातील तरतूद २२ (अ) नुसार अनधिकृत आणि नियमभंग करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. त्यानुसार मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी संस्था तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले.
४७ विद्यार्थ्यांचे पुनर्वसन
संस्थेतील विद्यार्थ्यांना खालील शासकीय मान्यताप्राप्त बालगृहांमध्ये पाठविण्यात आले आहे :
ज्ञानेश बालमंदिर, फुलगाव (मरकळ रोड)
ज्ञानमंदिर बालगृह, नारकरवाडी (ता. आंबेगाव)
सह्याद्री बालगृह, मंचर (घोडेगाव रोड)
कारवाईत सहभागी अधिकारी
या कारवाईत आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, नगरपरिषद अधिकारी, दामिणी महिला पोलीस पथक, बाल संरक्षण अधिकारी तसेच अन्य प्रशासकीय अधिकारी सहभागी होते.
आळंदीत संतापाची लाट
या घटनेमुळे आळंदी परिसरात संताप व्यक्त होत असून वारकरी शिक्षण संस्थांची तात्काळ तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पालकांनी आपल्या मुलांना केवळ शासनमान्य संस्थांमध्येच प्रवेश द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, तात्काळ कारवाई केल्याबद्दल आळंदी पोलीस व नगरपरिषद प्रशासनाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई कुऱ्हाडे-पाटील यांनी आभार मानले आहेत.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























