पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार)
पुरंदर (पुणे) : पुरंदर तालुक्यातील पांगारे परिसरात ४ मार्च २०२६ रोजी भीषण वनवा लागून डोंगररानाचा मोठा भाग जळून खाक झाला. एका बाजूने लागलेली आग वेगाने पसरत जाऊन जवळपास ९० टक्के डोंगररान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
या आगीत परिसरातील नैसर्गिक गवत पूर्णपणे भस्मसात झाले असून त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या गाई-गुरांसाठी असलेला चारा नष्ट झाला आहे.
दरम्यान, पांगारे (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील गट क्रमांक ८७० मध्ये लागलेल्या आगीत शेतकरी संदीप एकनाथ काकडे यांच्या फळबागेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतातील पेरू, संत्रा, सीताफळ, चिंच व हापूस आंबा या फळझाडांची बाग जळून खाक झाली.
तसेच बागेसाठी बसवलेली एचडीपी काळा गोटा पाईपलाईन, पीव्हीसी पाईप्स आणि ड्रिप इरिगेशनची व्यवस्था आगीत पूर्णपणे जळून गेली.
वनव्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी मोठ्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
दरवर्षी उन्हाळ्यात या परिसरात वनवे लागण्याच्या घटना घडत असल्याने वनविभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























