- पुरंदर (प्रतिनिधी अशोक कुंभार). अनुसूचित जाती प्रवर्गातील महारवतन धारक शेतकऱ्यांच्या न्यायाच्या मागणीसाठी पुरंदरच्या प्रांत कार्यालयासमोर आज भजन आंदोलन करण्यात आले. तब्बल ३३ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, पुरंदरचे तहसिलदार विक्रम राजपूत यांनी आर्थिक तडजोडीतून आंबोडी येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील महारवतन धारक शेतकऱ्यांच्या शेतातून बाहेरील उद्योजकाला १२ फुटी रस्ता मंजूर करून अधिकाराचा गैरवापर केला. त्यामुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच सासवडचे मंडलाधिकारी सुहास कांबळे यांनी खोटा स्थळ पाहणी अहवाल सादर करून अर्जदारास मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दोघांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे या या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून, जिल्हाधिकाऱ्यांनीही प्रांत अधिकाऱ्यांना लेखी आदेश दिल्याचे आंदोलकांनी सांगितले. तरीही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप
आज शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी प्रांत कार्यालयासमोर भजन आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आंदोलनकर्ते प्रकाश रणपिसे, अशोक रणपिसे आणि चंद्रकांत रणपिसे यांनी तहसिलदार व मंडलाधिकारी यांच्या महसुली खटल्यांतील सर्व निर्णयांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली.
प्रकाश रणपिसे यांनी आरोप केला की, प्रांत अधिकारी वर्षा लांडगे या तहसिलदार विक्रम राजपूत व मंडलाधिकारी सुहास कांबळे यांना पाठीशी घालून भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























