पुणे.रविदासकदम) जीवनात अनेकदा गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत. कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात यश–अपयश अपरिहार्य असते. यशाने अति हरखून न जाणे आणि अपयशाने खचून न जाता पुढे जाणे—हेच खेळ आयुष्याला शिकवतो. त्यामुळे कोणताही खेळ निवडा, तो सातत्य, चिकाटी आणि स्वतःतील सर्वोत्तम देऊन खेळा. अपयशासाठी इतरांना दोष न देता जबाबदारी स्वीकारून स्वतःच्या चुकांवर काम केल्यास, खेळ कुठलाही असो, यश निश्चित मिळतेच, असे प्रतिपादन ऑलिंपियन मुष्ठीयोद्धा विजेंदर सिंह यांनी केले.
ते एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे तर्फे आयोजित आठव्या विश्वनाथ स्पोर्ट मिट (VSM–2026) या देशातील महत्त्वाच्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन/आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
यावेळी **भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई)**चे नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थेचे (एनएसएनआयएस) उपमहासंचालक व वरिष्ठ कार्यकारी संचालक विनित कुमार, मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे, विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष तथा कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक डॉ. सुनीता कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., एव्हरेस्टवीर डॉ. सारा सफारी, अर्जुन पुरस्कारप्राप्त मुष्ठीयोद्धा मनोज पिंगळे, प्र-कुलपती डॉ. रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुराज भोयार, क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड, सह-समन्वयक डॉ. प्रतिभा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
विजेंदर सिंह पुढे म्हणाले की, सध्या भारतात क्रीडा क्षेत्राचा सुवर्णकाळ सुरू आहे. पूर्वी पालक अभ्यासावर भर देत; मात्र आता क्रीडा क्षेत्रात करिअरसाठी प्रोत्साहन देताना दिसतात. अशा काळात एमआयटी एडीटी विद्यापीठाने एवढ्या मोठ्या स्तरावर क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे प्रेरणादायी आहे. विद्यापीठातील क्रीडा सुविधा जागतिक दर्जाच्या असल्याचेही त्यांनी कौतुक केले.
प्रा. डॉ. सुनीता कराड म्हणाल्या, भारतात क्रीडा संस्कृती वेगाने बहरत आहे. पुण्यात सुरू असलेल्या ग्रँड टूर सायकल स्पर्धेमुळे शहर क्रीडामय झाले आहे. ऑलिंपिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंचा सहभाग वाढावा, यासाठी विद्यापीठ स्तरावरच दर्जेदार व्यासपीठ देण्याचा प्रयत्न विश्वनाथ स्पोर्ट मिटच्या माध्यमातून करण्यात येतो. त्यासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठात जागतिक दर्जाच्या सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
विश्वशांती प्रार्थना व स्पर्धेचा ध्वज फडकवल्यानंतर मॅनेट कॅडेटतर्फे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. प्रास्ताविक प्रा. डॉ. राजेश एस. यांनी केले, तर आभार प्रा. पद्माकर फड यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. अशोक घुगे, डॉ. स्वप्निल शिरसाट आणि प्रा. स्नेहा वाघटकर यांनी केले. 
खेळाचा आनंद घ्यायला शिका – तृप्ती मुरगुंडे
खेळाची परिभाषा बदलली आहे. फिट इंडिया, खेलो इंडिया यांसारख्या उपक्रमांमुळे भारतीय खेळाडूंनी जागतिक यश मिळवले आहे. मात्र करिअरचा निर्णय दबावाखाली न घेता आत्मपरीक्षण करा आणि सर्वांत महत्त्वाचे—खेळाचा आनंद घ्यायला शिका, असे तृप्ती मुरगुंडे यांनी नमूद केले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























