जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ : नामनिर्देशन प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन
राजगुरुनगर : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन प्रक्रियेबाबत उमेदवारांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. राखीव जागेवरून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र सादर करताना संबंधित कायदे व नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असल्याचे निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती तसेच नागरिकांच्या मागासवर्गीय (ओबीसी) यांच्यासाठी राखीव असलेल्या जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रासोबत महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय (जात प्रमाणपत्र पडताळणी) नियम, २००० मधील तरतुदीनुसार जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र (Validity Certificate) जोडणे आवश्यक आहे.
उमेदवार कोणत्या गट किंवा गणातून निवडणूक लढवत आहे, त्या गटातील किंवा गणातील मतदार असणे बंधनकारक नाही. मात्र संबंधित जिल्ह्यातील कोणत्याही गट किंवा गणाच्या मतदार यादीत उमेदवाराचे नाव असणे आवश्यक आहे. तथापि, उमेदवाराचा सुचक (प्रस्तावक) हा त्याच गटातील व गणातील मतदार असणे अनिवार्य आहे.
एकाच व्यक्तीने एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रावर सुचक किंवा अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अनामत रक्कम पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे —
सर्वसाधारण प्रवर्ग :
जिल्हा परिषद – ₹१,०००
पंचायत समिती – ₹७००
अनुसूचित जाती :
जिल्हा परिषद – ₹५००
पंचायत समिती – ₹३५०
अनुसूचित जमाती :
जिल्हा परिषद – ₹५००
पंचायत समिती – ₹३५०
नागरिकांचा मागासवर्गीय (ओबीसी) :
जिल्हा परिषद – ₹५००
पंचायत समिती – ₹३५०
ही अनामत रक्कम नामनिर्देशन पत्र सादर करण्यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात किंवा संबंधित विभक्ती अधिकारी यांच्याकडे जमा करून त्याची पावती प्राप्त करणे व ती पावती नामनिर्देशन पत्रासोबत जोडणे बंधनकारक आहे.
राजकीय पक्षाच्या अधिकृत उमेदवाराबाबत नमुना २-अ जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. संबंधित पत्र सादर करताना त्याची पोच घेणे बंधनकारक असून ही पोच लेखी स्वरूपात असावी. सदर पोचाची छायांकित प्रत संबंधित राजकीय पक्षाने आपल्या उमेदवाराला देणे आवश्यक आहे.
नामनिर्देशन पत्रे दि. १६ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, खेड उपविभाग, राजगुरुनगर यांच्या कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत. मात्र दि. १८ जानेवारी २०२६ रोजी नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार नाहीत, असा आदेश विभागीय अधिकारी, खेड उपविभाग श्री. दौडे तसेच तहसीलदार श्री. प्रशांत बोडशे यांनी दिला आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व कायद्याच्या चौकटीत पार पाडण्यासाठी उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी वरील सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























