आळंदी (रवी कदम):
तीर्थक्षेत्र आळंदीतील भाविकांची श्रद्धास्थान असलेली पवित्र इंद्रायणी नदी वाढत्या जलप्रदूषणामुळे पुन्हा एकदा पांढऱ्या फेसाने फेसाळली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतून थेट रसायन व मैला मिश्रित सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने नदी प्रदूषण धोक्याच्या पातळीवर पोहोचले असून भाविक, वारकरी व नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नदीपात्रात मोठ्या प्रमाणात राडा-रोडा, कचरा टाकला जात असून पुलांच्या बांधकामावेळी पडलेला मलबा अद्याप न काढल्याने नदीचे पात्र अरुंद होत आहे. पूर नियंत्रण रेषेत सुरू असलेल्या बांधकामांकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व आळंदी नगरपरिषद केवळ नदीकाठ विकासावर भर देत असून प्रत्यक्ष नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करत नसल्याने “नदी स्वच्छ न करता विकास कशासाठी?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
जय गणेश मंदिर परिसर, स्मशानभूमी भाग व विविध घाट परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून प्रभावी स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच श्री स्वामी महाराज घाटाजवळील पुलाखालील भुयारी मार्ग (सब-वे) अद्याप वापरास न दिल्याने भाविकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.
इंद्रायणी नदीतील वाढत्या प्रदूषणामुळे आळंदी नगरपरिषदेला भामा-आसखेड धरणातून पाणी मागवावे लागले असून जलशुद्धीकरण यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडत आहे. नदीवरील पाणी साठवण बंधाऱ्यांची दुरवस्था व गळतीमुळे पाणी साठवणीत अडचणी येत आहेत.
नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदने देऊन नदी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र पुणे जिल्हा प्रशासन व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्याप ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























