सासवड (पुरंदर, पुणे): सासवड एसटी आगारातून जेजुरी, नारायणपूर, चिरेवाडी घाट, बालाजी मंदिर आणि कापूरहोळ मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असतानाही एसटी बसेस थांबत नसल्याची गंभीर तक्रार नागरिकांनी केली आहे.
विशेषतः पुणे–कापूरहोळ–सातारा–सांगली–कोल्हापूर या मार्गावर प्रवासी मोठ्या प्रमाणात असतानाही वाई, महाबळेश्वर, वडूज, कोरेगाव, फलटण, कराड येथून जाणाऱ्या बस थांबत नाहीत, अशी नागरिकांची नाराजी आहे.
मंदिरदर्शनासाठी येणारे भाविक, कामानिमित्त येणारे नागरिक तसेच विद्यार्थी यांना खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे आर्थिक नुकसान होत असून महामंडळाचेही मोठे उत्पन्न खाजगी वाहनांकडे जात असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.
प्रवाशांचे म्हणणे आहे की,
एसटी बसचालकांनी आणि कर्मचाऱ्यांनी किमान गर्दीच्या ठिकाणी बस थांबवावी, प्रवासी घेतले पाहिजेत, आणि आवश्यकतेनुसार बसेसची संख्या वाढवावी.
नागरिकांची ठाम मागणी:
➡ तात्काळ बस थांबे वाढवावेत
➡ गर्दीच्या वेळेस प्रवाशांना बसमध्ये घेतले पाहिजे
➡ सातारा विभागाच्या बस थांबवण्याबाबत आदेश द्यावेत
➡ खाजगी वाहनांकडून होणारे प्रवाशांचे आर्थिक शोषण थांबवावे
नागरिकांनी सासवड एसटी आगारातील अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























