पाली–सोजत (राजस्थान) | प्रतिनिधी.सचिन शिंदे/
परमपूज्य स्वामी गोविंद गिरीजी यांच्या ७८व्या जन्मोत्सवानिमित्त राजस्थानमधील पाली–सोजत येथे भव्य व दिव्य अशा धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्रीमद् भागवत कथेचे विशेष आयोजन करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
या धार्मिक सोहळ्याची सुरुवात १० जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता
नवदुर्गा चंडी हवन व कलश यात्रेने करण्यात आली.
त्यानंतर १२ जानेवारी, सोमवार रोजी सकाळी ८ वाजता
पाली दरवाजा, श्री भुवनेश्वर धाम येथे श्रीमद् भागवत कथेचा भव्य प्रारंभ झाला.
ही श्रीमद् भागवत कथा १२ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीत दररोज दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडत असून, विविध संत-महात्म्यांच्या प्रवचनांनी भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन मिळणार आहे.
तसेच १३ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान दुपारी १२ ते २ या वेळेतही विशेष संत प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात देशभरातील नामवंत संत-महात्म्यांची उपस्थिती लाभली असून त्यामध्ये
जगद्गुरु शंकराचार्य (कोचीपुरण),
परमपूज्य स्वामी श्री गुरु शरणानंद जी महाराज,
परमपूज्य स्वामी श्री अवधशानंद गिरीजी (जुना पीठ, हरिद्वार),
परमपूज्य योगगुरु श्री स्वामी रामदेव जी महाराज (हरिद्वार),
परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी श्री महेश आनंदपुरी जी महाराज (ओम आश्रम, तांडव),
तसेच परमपूज्य स्वामी चित् आनंद सरस्वती जी महाराज (ऋषिकेश)
यांची प्रवचनरूपी सेवा भाविकांना लाभत आहे.
या संपूर्ण धार्मिक सोहळ्याला महाराष्ट्रातील रामकृष्ण हरी आश्रम, आळंदी देवाची येथील २६ वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. हरिपाठ, भजन आणि नामस्मरणाच्या माध्यमातून महाराष्ट्राची वारकरी परंपरा राजस्थानच्या भूमीत अनुभवायला मिळत आहे.
“राम कृष्ण हरी… जय जय राम कृष्ण हरी…”
या अखंड नामस्मरणाने संपूर्ण परिसर अक्षरशः दुमदुमून गेला असून, भक्ती, संस्कार आणि परंपरेचा हा अनोखा संगम पाली–सोजतकरांच्या मनात भक्तीची नवी ऊर्जा निर्माण करणारा ठरत आहे.
परमपूज्य स्वामी गोविंद गिरीजी यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा भव्य-दिव्य धार्मिक सोहळा, पाली शहरात अध्यात्म, संस्कृती आणि भक्तीचा अद्वितीय अनुभव देणारा ठरणार आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम





















