(सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार)
लोणी-काळभोर (पुणे) : मुळा-मुठा नदी पात्रात बेकायदेशीरपणे कचरा टाकण्याच्या विरोधात MIT ADT विद्यापीठ येथील विद्यार्थ्यांचे ‘कचरा बंद’ आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच असून प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने परिसरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत.
लोणी-काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींकडून दररोज नदीपात्रात कचरा टाकला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. आंदोलनामुळे गेल्या सहा दिवसांपासून कचरा न उचलल्याने लोकवस्तीत दुर्गंधी व अस्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांनी ४ मार्च रोजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवले होते. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, मुदत संपल्यानंतरही परिस्थितीत बदल न झाल्याने १३ मार्चपासून पुन्हा आंदोलन तीव्र करण्यात आले.
दरम्यान, २७ फेब्रुवारी रोजी नदीपात्रातील कचऱ्याला लागलेल्या भीषण आगीमुळे चार दिवस विषारी धूर पसरला होता. या घटनेत काही विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणी प्रशासनाने हालचाल करत दोन्ही ग्रामपंचायतींना नोटिसा बजावल्या आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच हवेली पंचायत समितीने कचरा व्यवस्थापनासाठी पर्यायी जागा शोधण्याचे आदेश दिले आहेत.
तपासणीत गट क्रमांक ११३ ही जागा नदीपात्रातच येत असल्याचे स्पष्ट झाले असून, आता कचरा व्यवस्थापनासाठी पर्यायी व्यवस्था करणे दोन्ही ग्रामपंचायतींसाठी अनिवार्य झाले आहे.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने ग्रामसभेत पर्यायी जागेची मागणी करत कचरा हडपसर येथील घनकचरा प्रकल्पाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, लोणी-काळभोर ग्रामपंचायतीची ग्रामसभा अपुऱ्या उपस्थितीमुळे तहकूब झाल्याने निर्णय प्रलंबित आहे.
“नदीपात्रात कचरा टाकणे अत्यंत चुकीचे आहे. कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय स्तुत्य असून लोणी-काळभोर ग्रामपंचायतीनेही लवकरच ठोस भूमिका घ्यावी,”. .
— डॉ. महेश चोपडे, कुलसचिव, MIT ADT विद्यापीठ

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























