पुरंदर (पुणे) अशोक कुंभार:
पुरंदर तालुक्यातील मौजे आंबोली येथील अनुसूचित जाती प वर्गातील महार वतन शेतकऱ्यांवर अन्याय करत आर्थिक तडजोडीतून रस्ता मंजूर केल्याचा गंभीर आरोप पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत व सासवडचे मंडळ अधिकारी सुहास कांबळे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच अन्यायकारक आदेश तात्काळ रद्द करावेत, या मागणीसाठी सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 पासून उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.
मौजे आंबोली, तालुका पुरंदर येथील गट क्रमांक 136, 132, 138, 139, 140, 141, 142, 143, 144, 145 व 146 या महार वतन (इनाम वर्ग 6, वर्ग 2) जमिनीमधून जबरदस्तीने रस्ता काढण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला आहे. जमीन कावी क्रमांक 261/2024 अंतर्गत महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 अन्वये रस्ता मागणीचा अर्ज दाखल करण्यात आला होता.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, सदर अर्जातील काही मूळ अर्जदारांनी प्रत्यक्ष अर्जावर स्वाक्षरी केलेली नाही, तसेच न्यायालयीन कामकाजात हजर राहिल्याचे कोणतेही पुरावे सादर झालेले नाहीत. काही अर्जदारांचे परस्पर नाते स्पष्ट नसतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांचे जबाब नोंदवलेले नाहीत. मूळ अर्जदार नसतानाही अन्वर बाबुलाल शेख यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी अर्जाचा गैरवापर करून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, संबंधित ठिकाणी आधीपासूनच सार्वजनिक वहिवाटीचा रस्ता अस्तित्वात असताना केवळ गरीब अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना त्रास देण्याच्या हेतूने व महार वतन जमिनी पळकावण्यासाठी हा प्रकार केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उच्चदाब विद्युत वाहिनीखाली बेकायदेशीर बांधकाम तसेच महार वतन जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे आरोपही यावेळी करण्यात आले.
तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांनी बाधित शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देता, त्यांचे जबाब नोंदवले नाहीत, वकीलपत्र सादर करण्याची संधी दिली नाही, तसेच केवळ मंडळ अधिकाऱ्यांच्या अहवालावर अवलंबून राहून निर्णय दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. हा निर्णय अन्यायकारक असून आम्हाला मान्य नसल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























