पुरंदर सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार)
पुरंदर : पुणे जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची यात्रा वीर येथे मोठ्या उत्साहात सुरू आहे. माघ पौर्णिमा ते दशमी अशा दहा दिवसांच्या कालावधीत पार पडणारा हा यात्रा उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे.
१ फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेच्या दिवशी यात्रेची सुरुवात झाली असून १२ फेब्रुवारी रोजी यात्रेची सांगता होणार आहे. आज यात्रेचा आठवा दिवस असून श्रीनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. यावेळी देवाचा छबिना पार पडला. देवाचा संचार भक्तांच्या अंगात आल्यानंतर पारंपरिक तलवार खेळवण्याची प्रथा भक्तांनी सादर केली.
कोडीत, कने-ही, राजेवाडी आदी विविध गावांच्या पालख्या वीर येथे दहा दिवस मुक्कामी असतात. दशमीच्या दिवशी रंगाची मारामारी झाल्यानंतर यात्रेची सांगता केली जाते.
नवसाला पावणारा देव म्हणून श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे देवस्थान संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येथे दाखल होत आहेत.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























