मंदिरांमुळे समाज एकत्र येतो, संस्कृतीची जपणूक होते — आमदार
जालना : परतूर / प्रतिनिधी गजानन राजबिडे| 05 डिसेंबर 2025
ओम नाईक जाधव तांडा, पांगरी गोसावी (ता. मंठा) येथे जगदंबा देवी प्राणप्रतिष्ठा महोत्सवातील कलश रोहन सोहळा आज धार्मिक उत्साहात पार पडला. स्वामी विश्वेश्वरानंद महाराज (सुरत) आणि महंत विठ्ठल गिरी बाबा (गोखरेश्वर संन्यास आश्रम) यांच्या शुभहस्ते हा सोहळा मोठ्या भक्तीभावाने सम्पन्न झाला. या कार्यक्रमाला परतूर–मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची विशेष उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना आमदार लोणीकर म्हणाले, “हिंदू देवी-देवतांची मंदिरे ही हिंदू समाजाच्या संस्कृतीची, अध्यात्मिक ऊर्जेची आणि सामाजिक एकात्मतेची केंद्रे आहेत. मंदिरांच्या माध्यमातून समाजात मूल्यांची जपणूक होते, लोक एकत्र येतात आणि अध्यात्मिक बळ वाढते.”
महाराष्ट्राने जपलेल्या संतपरंपरेचा स्मरण करून त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा आदी संतांच्या कार्याचा उल्लेख केला. “संतांच्या विचारातून समाजजागृती, भक्तीचे सामर्थ्य आणि समतेचा संदेश आजही मार्गदर्शक आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी पुढे बोलताना आमदार लोणीकर यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्मितीला जनभावनेचा ऐतिहासिक विजय म्हटले. “दशकानुदशके प्रलंबित असलेल्या भव्य राममंदिराच्या निर्मितीचे कार्य केंद्रातील भाजपा शासनाने पूर्ण केले. या निर्णयाने देशातील सर्व रामभक्तांच्या भावना पूर्ण झाल्या,” असे ते म्हणाले.
तसेच, मतदारसंघातील सर्व मंदिरांना सभागृह बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द त्यांनी या ठिकाणी दिला.
दरम्यान, परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. ढोल-ताशांचा गजर, मंत्रोच्चार आणि देवीच्या जयघोषाने पांगरी गोसावी गाव दुमदुमून गेले. सोहळ्याच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आमदार लोणीकर यांनी ग्रामस्थ व समितीचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर एड. उत्तमराव राठोड, डॉ. आशिष राठोड, मोहन आडे, भीमराव जाधव, महेश पवार, कल्याण चव्हाण, भास्कर राठोड यांसह मान्यवर उपस्थित होते.
जगदंबा देवी प्राणप्रतिष्ठा महोत्सवामुळे परिसरात धार्मिक उत्साह, सांस्कृतिक चैतन्य आणि सामुदायिक एकात्मतेचा माहोल निर्माण झाला.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























