काळूस भागात शेतकऱ्यांचे बेकायदेशीर पुनर्वसन हटविण्याच्या मागणीसाठी उपोषण ; ४ दिवसांपासून आंदोलन सुरू, आमदार बाबाजी काळे यांनी साधला संवाद, तीव्र आंदोलनाचा इशारा



आळंदी (प्रतिनिधी –( रवि कदम) :
भामा आसखेड व चासकमान धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली काळूस येथील शेतकऱ्यांनी १५ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू असून, शेतकरी अधिक आक्रमक भूमिकेत आहेत.
खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. मात्र मागण्या तातडीने मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
या उपोषणात सुभाष पवळे, संतोष खलारे, भरत आरगडे, विठ्ठल आरगडे, विश्वनाथ पोटवडे सहभागी आहेत. आंदोलनाला बाळासाहेब दौडकर, रामदास वाटेकर, सोमनाथ पवळे, सुरेश कौटकर, दत्ता सुक्रे, नवनाथ जाधव, कान्हू वाटेकर, सुशीला पवळे, सुलाबाई पवळे, शालन गायकवाड यांनी पाठिंबा दर्शविला आहे. रयत क्रांती शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते गजानन गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरू आहे.
रयत करणी संघटनेच्या नेतृत्वाखाली व खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहभागातून हे आंदोलन होत असून, खेड तालुका अध्यक्ष सुभाष पवळे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत अन्यायकारक बेकायदेशीर पुनर्वसन तातडीने रद्द करावे अशी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
(१)भामा आसखेड व चासकमान धरण संपादित जमिनींवर ४० वर्षांपासून असलेले बेकायदेशीर पुनर्वसन शिक्के काढणे.
(२)दाखल दाव्यानुसार बेकायदेशीर पुनर्वसन रद्द करणे.
(३)बेकायदेशीर वाटप व खरेदी खाते रद्द करणे; दोषींवर कारवाई.
(४)आधी वगळलेल्या जमिनीप्रमाणेच काळूससह इतर गावांना पुनर्वसनातून वगळणे.
(५)तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करणे.
आंदोलनस्थळी आमदार बाबाजी काळे यांनी उपोषणकर्त्यांची चौकशी करून त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली. मात्र प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन होणार असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























