

संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे झालेल्या एका कीर्तन कार्यक्रमात कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा राजकीय वादळ उठले आहे. “आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल” असे भडक विधान भंडारे यांनी केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने आळंदीत संतापाची लाट उसळली.
या वक्तव्याच्या निषेधार्थ आज २२ ऑगस्ट रोजी आळंदीत नागरिक, वारकरी बांधव व माऊली मंदिर भक्तांनी महाद्वार चौकात निषेध नोंदवत भंडारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली. आळंदी पोलिस स्टेशनमध्ये ग्रामस्थांच्या वतीने लेखी निवेदन देखील देण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे नेते उत्तम गोगावले यांनी ठाम इशारा देत म्हटले की, “पुढील काळात कोणत्याही महाराजांनी आपल्या आडनावासमोर ‘आळंदीकर’ लिहायचे नाही,” असा खणखणीत इशारा देत त्यांनी भंडारे यांच्या वक्तृत्वाचा निषेध केला.
निषेध सभेला माजी विरोधी पक्षनेते डीडी भोसले पाटील, काँग्रेस पक्षाचे डॉक्टर्स सेलचे उपाध्यक्ष डॉ. मनोज रांका, शिवसेना माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे, काँग्रेस शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष विलास कुऱ्हाडे, एस.पी. गट काँग्रेसचे संदीप नाईकरे पाटील, प्रकाश कुऱ्हाडे, सौरभ गव्हाणे, सतीश सागर, रानवडे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, मंगेश आरू, संजू वडगावकर, माऊली घुंडरे, प्रसाद बोराटे, महेश कुऱ्हाडे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी स्पष्ट केले की, समाज प्रबोधनासाठी प्रवचन व कीर्तन झाले पाहिजे; पण गोडसेच्या नावाने समाजात विष पेरले गेले, तर आळंदीकरी व वारकरी भक्त कधीही ते सहन करणार नाहीत.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























