आळंदी, दि. १३ जून (प्रतिनिधी रोहिदास कदम): संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र नगरी आळंदीच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त तथा पालखी प्रमुख अँड राजेंद्र उमाप यांनी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजय मिळवत तिसऱ्या क्रमांकावर स्थान पटकावले. त्यांच्या या दणदणीत विजयामुळे आळंदीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे सदस्य व ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भावार्थ देखणे यांना केंद्र सरकारचा प्रतिष्ठेचा “उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कार – २०२४,२०२५ जाहीर झाल्याने आळंदीच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवात भर पडली आहे. या दोन्ही मान्यवरांच्या यशामुळे आळंदी, संस्थान समिती आणि संपूर्ण महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या यशाबद्दल आयोजित अभिनंदन सोहळ्यात ओळख ज्ञानेश्वरी परिवाराचे अध्यक्ष प्रकाश तात्या काळे, अजित वडगावकर, शाकंभरी पाटील, राम मंदिर विश्वस्त अर्जुन मेदनकर, विलास वाघमारे, चंद्रकांत मोरे, आव्हळे, रोहिदास कदम हे हभप प्रल्हाद माऊली संस्थानचे माजी विश्वस्त अभय टिळक, ज्ञानेश्वर महाराज संस्थान विश्वस्त चैतन्य लोंढे, कबीर बुवा व निरंजननाथ योगी, सासवडचे विश्वस्त गोसावी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी दोन्ही मान्यवरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ओळख ज्ञानेश्वरी परिवाराच्या विस्ताराबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील अनेक नवीन शाळा आणि शैक्षणिक संस्था लवकरच ओळख ज्ञानेश्वरी परिवाराशी जोडल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली. यासंदर्भात बोलताना माजी विश्वस्त अभय टिळक यांनी सांगितले की, परिवाराशी संलग्न शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापकांचे एकदिवसीय संमेलन आयोजित करून त्यांना ज्ञानेश्वरीच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील गावागावांत आणि घराघरांत संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार पोहोचविण्याचे कार्य ओळख ज्ञानेश्वरी परिवार सातत्याने करत असून, समाजप्रबोधनाची ही संकल्प अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. 

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























