आळंदी (रविदास कदम): अलंकापुरी नगरीत आमलकी एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे भाविकांची अभूतपूर्व गर्दी उसळली. सुमारे पन्नास हजारांहून अधिक वारकरी व भक्तांनी हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेत नगरप्रदक्षिणा पूर्ण केली. मंदिरात पहाटे वेदमंत्रांच्या जयघोषात पवमान अभिषेक पार पडला.
गाभाऱ्यातील लक्षवेधी पुष्पसजावटीमुळे श्रींचे रूप अधिकच खुलून दिसत होते. दिवसभर पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य, प्रवचन व रात्री धुपारती असे धार्मिक कार्यक्रम परंपरेने संपन्न झाले. वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. दर्शन व्यवस्थेसाठी व्यवस्थापक माउली वीर व उपव्यवस्थापक तुकाराम माने यांनी सेवक, कर्मचारी, सुरक्षा रक्षक व पोलिसांच्या सहकार्याने सुरळीत नियोजन केले.
🚔 वाहतुकीचे सुयोग्य नियोजन
एकादशीच्या पार्श्वभूमीवर आळंदी पोलीस स्टेशन व वाहतूक शाखेच्या वतीने विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदेशीर पार्किंग व बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरू आहे. भाविकांनी रस्त्यावर वाहने उभी न करता इमारतीखालील पार्किंगचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नगरपरिषदेकडून मंजूर आराखड्यानुसार पार्किंग जागांचा वापर न केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
🌊 इंद्रायणी घाटावर आरती उत्साहात
एकादशी निमित्त इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समितीच्या पुढाकाराने हरिनाम गजरात भव्य आरती संपन्न झाली. इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, महिला बचत गट सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरतीनंतर पसायदान व प्रसाद वाटप उत्साहात झाले.
इंद्रायणी नदीचे पावित्र्य जपण्यासाठी व प्रदूषणमुक्तीसाठी उपक्रम राबविण्यात येत असून, यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजिका अनिता झुजम यांनी केले. आरतीपूर्वी घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
इंद्रायणी आरती सेवा समितीच्या उपक्रमाला वाढता प्रतिसाद मिळत असून, जलसंवर्धनाचा संदेश देत अलंकापुरीत भक्तिभाव आणि सामाजिक बांधिलकीचा संगम अनुभवायला मिळत आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























